Home Blog

श्री हनुमान विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा साजरा…….

श्री हनुमान विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा साजरा…….

संपादकीय:-

श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा यांच्यावतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व वारकरी वेशभूषा परिधान करून गावामध्ये पालखी वीणा, तुळस, टाळ-मृदुंग यांच्या साथीने “ज्ञानोबा-तुकाराम”, “राम कृष्ण हरी” या नामगजरात पालखीची मिरवणूक काढली. अभंग, भजन ,फुगडी व पारंपारिक खेळ आणि विठ्ठल नामस्मरणामुळे संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा, वारकरी संप्रदायाचा तसेच भक्ती, संस्कार, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. वेळी विद्यार्थ्यांनी मनसोक्त फुगड्या व पारंपारिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला . विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यात हिरेरीने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांचे गावामध्ये व पंचक्रोशी मध्ये सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.गावामध्ये दारोदारी सडा रांगोळी काढून पालखीचे व वेशभूषा परिधान केलेले विठ्ठल – रुक्मिणी व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची महिलांनी व आबाल वृद्धांनी पूजा केली व दर्शन घेतले .काही विद्यार्थ्यांनी गोपीचंद -अष्टगंध -बुक्का लावण्याची सेवा केली .गावातील लोकांनी रमणीय दृश्य पाहून मोबाईल मध्ये फोटो काढले . “संतांच्या विचारांचा वारसा जपूया, भक्ती-संस्कारांची परंपरा पुढे नेऊया” असा संदेश या पालखी सोहळ्यातून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे संस्थापक अरुण दादा शिंगटे सचिव विजया शिंगटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे सहशिक्षक नाना घळके, तानाजी राऊत, दत्तात्रय गवळी, अरुण रसाळ, अरुणा कवडे, ज्योती लोंढे, मीरा घळके, तेजल कारंडे, शांतीनाथ शिंदे पाटील, हरिदास कवितके, राजेंद्र पेंडवळे, प्रकाश मगर , अजिंक्य जाधव, तसेच अवसरी ग्रामस्थ , पालक,व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत; वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबिर

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत; वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबिर

संपादकीय :-

आषाढी वारीनिमित्त श्री संत निळोबाराय पालखी सोहळा तसेच श्री संत खाशाबा महाराज पायी दिंडी सोहळा (दिंडी क्र. २१), मु.पो. गुणोरे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, श्री क्षेत्र गुणोरे–पिंपळनेर ते पंढरपूर या पायी वारीदरम्यान चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची रक्तदाब (बी.पी.) तपासणी करून त्यांच्या आरोग्याची प्राथमिक माहिती घेतली. तसेच वारकऱ्यांना ओआरएस (ORS) पाकिटे, वेदनाशामक बाम, पेन रिलीफ जेल, पोविडोन आयोडीन मलम, अँटासिड औषधे, वेदनाशामक गोळ्या, उलटीविरोधी औषधे तसेच इतर आवश्यक प्राथमिक आरोग्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय उष्माघात प्रतिबंध, स्वच्छता, पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन व पायांची काळजी याबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी पालखी सोहळ्याचे व वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी वारी परंपरेचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करत समाजसेवा हीच खरी मानवसेवा असल्याचे सांगितले. या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी दिंडी प्रमुख श्री. मनसुख दत्तात्रय बडे यांनी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे व्यवस्थापन, प्राचार्य, अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल तसेच वारकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा शिबिराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांना आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, मानवता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमास चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी शुभेच्छा देत महाविद्यालयाच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. भविष्यातही अशा सेवाभावी व जनहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमास पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद सेवा, समर्पण आणि भक्तीचा अनोखा संगम; हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे हेच आमचे भाग्य-रामेश्वर नाईक नाईक

आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमास पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

सेवा, समर्पण आणि भक्तीचा अनोखा संगम; हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ

वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे हेच आमचे भाग्य-रामेश्वर नाईक नाईक

संपादकीय :-

पुणे, दि. १८ : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमास यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पायी चालून आलेल्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना आराम मिळावा, त्यांच्या प्रवासातील शारीरिक ताण कमी व्हावा आणि सेवाभावाची परंपरा अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

वारी मार्गावरील विसावा ठिकाणी उभारण्यात आलेल्या चरणसेवा केंद्रांमध्ये स्वयंसेवकांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत करत पायांची स्वच्छता, तेल मालिश तसेच आवश्यक प्राथमिक सेवा उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना, युवक मंडळे तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने दिवसभर वारकऱ्यांची सेवा करत ‘सेवा हीच खरी ईश्वरभक्ती’ हा संदेश कृतीतून दिला.

*श्री. रामेश्वर नाईक* आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. ‘चरणसेवा’ उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना अधिक दृढ करणारा आहे. भविष्यातही अशा सेवाभिमुख उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे.”

पुणे जिल्ह्यातील या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या प्रवासात दिलासा मिळाला असून भक्ती, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. या उपक्रमाचे वारकरी तसेच नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची मोशी येथील घटनास्थळी भेट

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची मोशी येथील घटनास्थळी भेट

मोशी येथील दुर्घटनेतील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू – आपत्ती व्यवस्थापन मंत्री

सहा जणांना बाहेर काढण्यात यश ; तिघांशी संपर्क, उर्वरित जणांचा शोध सुरु

पुणे, दि. ८ : पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा ढीग कोसळून इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून आता पर्यंत सहा जणांना सुखरूप बाहेर काढले असून उर्वरित सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर मंत्री श्री. महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी केली. यावेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. महाजन यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेले ५ नागरिक स्वतःहून सुरक्षित बाहेर आले, तर बचाव पथकाने ६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. आणखी ३ नागरिकांशी संपर्क झाला असून तेही सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ते पुढे म्हणाले की, गेल्या ३० ते ३५ तासांत परिसरात ६०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे कचऱ्याचा मोठा लोट इमारतीच्या दिशेने वाहून आल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

सध्या घटनास्थळी इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जागा अत्यंत कमी असल्यामुळे बचावकार्य संथगतीने करावे लागत असून ही मोहीम रात्रभर आणि आवश्यक असल्यास सकाळपर्यंतही सुरू राहणार आहे. बचावकार्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयाने कार्यरत असल्याचेही श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बचाव पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. तसेच घटना घडल्यानंतर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ च्या गजरात आळंदीनगरी दमदुमली

 

संपादकीय :-

पुणे, दि. ७: संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली, यावेळी त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले.

 

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

आळंदी येथील मंदिर परिसरात टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती वारकऱ्यांना अनुभवाला मिळत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

आळंदी परिसरात येणाऱ्या भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा, निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, महिला स्नानगृह, मोबाईल चार्जिंग चार्जिंग स्टेशन, चौकाचौकात पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त, स्वच्छता पथक तैनात, भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण उद्घोषण यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

🚨 पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

🚨 पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

संपादकीय :-

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत.

📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

– लँडलाईन : ०२०-२६१२३३७१

– टोल फ्री हेल्पलाईन : १०७७

– मोबाईल : ९३७०९ ६००६१

🏛 पुणे महानगरपालिका (PMC)

– ०२०-२५५०१२५९

– ०२०-२५५०६८००

🏙 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)

– ०२०-६७३३११११

🚑 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)

– ९५४५२ ८२९३०

⚠️ नागरिकांना आवाहन :

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

पुणे, दि. ५ जुलै : भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दि. ६ जुलै रोजी सुट्टी राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच प्रशासन व भारतीय हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

 

सरडेवाडी, ता. इंदापूर : चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर येथील डॉ. राहुल जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. राहुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टरांचा समाजातील अनमोल वाटा, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्ये, रुग्णसेवा आणि आरोग्य जनजागृती याविषयी सविस्तर विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सेवाभाव, संवेदनशीलता आणि व्यावसायिक प्रामाणिकता जपावी, असे आवाहन केले.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजारपण, अपघात, महामारी किंवा कोणत्याही आरोग्यविषयक संकटाच्या काळात डॉक्टर आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावाच्या बळावर रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करतात. त्यामुळे समाजात डॉक्टरांचे स्थान अत्यंत मानाचे आणि आदरणीय आहे.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा केवळ डॉक्टरांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून समाज आणि आरोग्यसेवा यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर आदर अधिक दृढ करणारा दिवस आहे. डॉक्टरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नागरिकांनीही आरोग्याविषयी सजग राहून वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

प्रमुख पाहुणे डॉ. राहुल जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नैराश्य (डिप्रेशन), चिंता (अॅन्झायटी), ताण-तणाव आणि इतर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून, या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मानसिक आजारांविषयी समाजात असलेला गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. नैराश्य किंवा चिंतेची लक्षणे दिसल्यास ती लपविण्याऐवजी कुटुंबीय, मित्र किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, ध्यान-योग आणि सकारात्मक विचारसरणी यांमुळे मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपैकी सुप्रिया पांढरे, राजनंदिनी खबाले, आरती कारंडे आणि संग्राम गायकवाड यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त मनोगते व्यक्त केली. त्यांनी डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करत समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आरोग्य जनजागृती, निरोगी जीवनशैली आणि फार्मासिस्टची भूमिका याविषयी प्रभावी विचार मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे सादर केली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. गीतांजली कांबळे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डेचे महत्त्व विशद करताना आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.प्रा. स्वप्नील पाटील यांनी विद्यार्थ्यांना रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा, नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन प्रा. रुचिता भंडारी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या केले. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यसेवेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले तसेच कोषाध्यक्ष श्री. सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) परीक्षा 2026 मध्ये घवघवीत यश

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) परीक्षा 2026 मध्ये घवघवीत यश

संपादकीय :-

सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील प्रथम वर्ष डी.फार्मसी व द्वितीय वर्ष डी. फार्मसी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल नोंदवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. महाविद्यालय हे फार्मसी कौन्सिलिंग ऑफ इंडिया, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे संलग्न असून गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षणासाठी ओळखले जाते.
यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसी वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कु. साक्षी तुकाराम राखुंडे यांनी 76.30% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. पिंकू राजू शिंदे यांनी 74.10% गुणांसह द्वितीय क्रमांक, कु. विद्या तुकाराम गुरगुडे यांनी 72.40% गुणांसह तृतीय क्रमांक, कु. पायल लाहू बनसोडे यांनी 70.10% गुणांसह चतुर्थ क्रमांक तर कु.सायली योगेश घाडगे यांनी 69.40% गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
तसेच महाविद्यालयातील एस.वाय. डी.फार्म. वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कु. विद्या भोई आणि कु. प्रतिक्षा गुंड यांनी प्रत्येकी 77.09% गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. कु. शिल्पा भोपे हिने 75.55% गुणांसह द्वितीय, कु. वैष्णवी खटाळ हिने 75.46% गुणांसह तृतीय, तर कु. वर्षराणी इरकर हिने 73.82% गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला. तसेच शिवम ननवरे यांनी 71.73% गुण मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले

प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, अधिक मेहनत, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम फार्मासिस्ट बनण्याचे आवाहन केले. महाविद्यालय उत्कृष्ट शिक्षण, नैतिक मूल्ये आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, प्रयोगशाळा सुविधा आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.”
यावेळी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची चिकाटी, नियमितता आणि जिद्द हे महत्त्वाचे घटक असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी हे “Revolution Through Education” या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देत असून शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी कटिबद्ध आहे. महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेचा गौरव अधिकच वाढला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची कठोर मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डी.फार्मसी व बी.फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

संपादकीय

सरडेवाडी येथील चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने सर तसेच शाळेच्या प्राचार्या निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास नर्सरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ गणेश म्हस्के सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर वढणे साहेब, प्रवीण भैय्या माने, प्रदीप दादा गारटकर, ॲड. मयूर शिंदे, प्रेमकुमार जगताप, रामभाऊ आसबे, सचिन शिरसट, आप्पासाहेब माने आणि नवनाथ शिंदे सर उपस्थित होते. तसेच पतंजली परिवाराचे योग प्रशिक्षक आजिनाथ दळवी सर, बाळासाहेब शिंदे सर आणि हनुमंत यादव सर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी प्रवीण भैय्या माने यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना, “जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तीच असते ज्याचे शरीर निरोगी असते,” असे सांगून नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच चंद्रशेखर वढणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश दिला. नियमित योगासने केल्याने शरीर निरोगी राहते व मन शांत व एकाग्र होते, असे त्यांनी सांगितले.

योग दिनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन भोजू गायकवाड सर व ज्योती शिंदे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राखण्याची जबाबदारी माधुरी चव्हाण मॅडम व मोरे मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे सर यांनी केले, तर जयश्री सचिन गोळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला व विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मोलाची मदत झाली,चेतना स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये योग दिन यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये चिन्मय देशपांडे सर, प्रवीण सुर्वे सर यांचे खूप मोलाचे योगदान केले.

या मध्ये देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पने तुन एक पेढ माँ के नाम हा पण उपक्रम हिंदुस्थान 24न्यूज टीम व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांनी रबावाला

error: Content is protected !!