Home Blog

गिर्यारोहण ह्या साहसी क्रीडा प्रकाराला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार – ना. मुरलीधर मोहोळ.

गिर्यारोहण ह्या साहसी क्रीडा प्रकाराला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार – ना. मुरलीधर मोहोळ.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या अखिल काटकर चा सत्कार – संदीप खर्डेकर.

गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे.यातून एक साहसी पिढीची जडणघडण होत आहे.या खेळाला आर्थिक पाठबळ आवश्यक आहे तसेच या खेळासाठी स्वतंत्र विमा कवच असणे गरजेचे आहे असे मत ऑलम्पिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष ना. मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.याबाबत गिरीप्रेमीचे उमेश झिरपे माझ्याकडे पाठपुरावा करत आहेत, मी या साठी शासन कडे नक्की पाठपुरावा करेन आणि या खेळा ला अधिक चालना मिळेल असा प्रयत्न नक्की करेन असेही ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे एव्हरेस्ट शिखर सर करून परतलेल्या अखिल काटकर चा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.पुणेरी पगडी, शाल व भेटवस्तू देऊन अखिलचा सत्कार करण्यात आला.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, अखिल च्या आई स्मिता काटकर, मामी लेखिका निलिमा बोरवणकर, मामा अजय बोरवणकर, विजय बोरवणकर इ मान्यवर उपस्थित होते.

आपल्याकडे क्रिकेट ला प्रचंड वलय आहे मात्र ( Glamour ) अन्य क्रीडाप्रकारांना हवी तेवढी लोकमान्यता आणि राजमान्यता मिळत नाही अशी खंत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष आणि रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली. यात बदल होण्यासाठी ना. मुरलीधर मोहोळ नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास ही खर्डेकर यांनी व्यक्त केला. ह्या साहसी क्रीडा प्रकारासाठी अखिल च्या कुटुंबियांनी त्याला प्रोत्साहन दिले यामुळे खरंतर त्यांचेही कौतुक करायला हवे असे मत मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.

एव्हरेस्ट वीर अखिल स्मिता रवींद्र काटकर (वय ३६) हे पुण्यातील एक गिर्यारोहक, प्रशिक्षक आणि गिरिप्रेमी संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. २१ मार्च १९९० रोजी जन्मलेल्या अखिल यांनी डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून काही वर्षे स्वतःचा कॅफे व्यवसायही यशस्वीपणे चालवला. मात्र पर्वत, साहस आणि समाजाभिमुख कार्याची ओढ त्यांना पुन्हा गिर्यारोहण क्षेत्रात घेऊन आली.

सध्या ते पूर्णवेळ गिरिप्रेमी संस्थेशी जोडलेले असून लहान मुलांसाठी प्रशिक्षण उपक्रमांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गिर्यारोहणासोबतच मॅरेथॉन, ट्रायथेलॉन आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

२१ मे २०२६ रोजी अखिल काटकर यांनी गिरिप्रेमीच्या इतर दोन सहकाऱ्यांसमवेत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट वर यशस्वीरित्या चढाई केली आणि भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला.

अखिल काटकर यांची एव्हरेस्ट शिखर चढाई ही केवळ वैयक्तिक यशाची गोष्ट नसून नव्या पिढीला आरोग्य, साहस, शिस्त आणि ध्येयपूर्तीकडे प्रेरित करणारी उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

अखिल चे अभिनंदन आणि सत्कार करतानाच अधिकाधिक तरुण तरुणींना विद्यार्थी दशेपासूनच ह्या खेळा प्रती आकृष्ट करण्यासाठी शिक्षण द्यावे अशी अपेक्षा संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.

आपला,

संदीप खर्डेकर.

अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.

मो – 9850999995

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

संपादकीय,

पुणे, दि. २७: पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र केल्याचे आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ व ६ महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४ जानेवारी २०२६ रोजी पार पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांनी अनुक्रमे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत (३० दिवस) निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही.

पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे ५ व २५ मे २०२६ रोजी याबाबत संबंधिताना आपले म्हणणे दाखल करण्याबद्दल सुनावणी आयोजित करण्यात आली. सदर सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उप आयुक्त प्रतिभा पाटील यांनी कळविली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जून रोजी भिगवण येथे;लाईफ सायन्स क्षेत्रात १९८ रिक्त पदांसाठी संधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जून रोजी भिगवण येथे;लाईफ सायन्स क्षेत्रात १९८ रिक्त पदांसाठी संधी

पुणे, दि. 26 (जिमाका, वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि दत्तकला शिक्षणसंस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी बुधवार, ३ जून २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली, भिगवण, ता. दौंड, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

लाईफ सायन्स क्षेत्रातील विविध रिक्त पदांसाठी आयोजित या मेळाव्यात सोहन हेल्थकेअर, क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी, मोडेप्रो इंडिया प्रा. लि., ओमनी अॅक्टीव्ह इंडिया प्रा. लि., एम जे बायोफार्मा लि., सेंच्युरी फार्मास्युटिकल लि., एमक्युअर फार्मा प्रा. लि., जिनेव्हा बायोफार्मा लि., इटेनरीस फाईन लि., हॉनर लॅब लि., अलिवुस लाईफसायन्स लि. यांसह नामांकित कंपन्या सहभागी होणार असून एकूण १९८ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

१० वी, १२ वी, डी. फार्म, बी. फार्म, बीएससी केमिस्ट्री, एमएससी केमिस्ट्री आणि एमएससी बायोटेक्नॉलॉजी पात्रताधारक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in⁠ या संकेतस्थळावर अर्ज करावेत तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि किमान पाच बायोडाटा प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क करावा.

गौण खनिज उत्खननासाठी अल्प मुदतीच्या परवान्याबाबत शासन निर्णय जारी उप विभागीय अधिकारी व तहसीलदारांना कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

गौण खनिज उत्खननासाठी अल्प मुदतीच्या परवान्याबाबत शासन निर्णय जारी

उप विभागीय अधिकारी व तहसीलदारांना कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि. २०: महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ च्या नियम ५८ व ५९ अन्वये अल्प मुदतीचे परवाने तहसीलदार यांच्या स्तरावरून देतांना महसूल व वन विभागाच्या १९ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.

 

गौण खनिज उत्खननासाठी तात्पुरते परवाने मिळवण्याकरीता तहसिलदार यांचेकडे अर्ज प्राप्त झाल्यास सदर *सर्व्हे कमांक , गट क्रमांक* हा नियम ५८ अन्वये जिल्हा खाणकाम योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा कसे यांची त्यांनी खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.

अल्प मुदतीचे, तात्पुरते परवाने हे जिल्हा खाणकाम योजनेत नियम ५८ अन्वये समितीच्या मान्यतेअंती समावेश केला असेल केवळ अशा क्षेत्रावर देण्यात (स.नं./ग.नं.) यावेत. समावेश करण्यासाठी प्रस्तावित अथवा विचाराधीन असलेल्या क्षेत्रावर किंवा ज्या क्षेत्रावर खाणपट्टा मंजूर करण्यात आलेला आहे अशा क्षेत्रावर अल्प मुदतीचे, तात्पुरते परवाने देण्यात येवू नयेत. तसेच समितीने एखाद्या विभागाची ना-हरकत प्राप्त करून घेण्याच्या अधीन राहून मान्यता दिली असल्यास हे ना-हरकत प्राप्त झाल्याशिवाय अल्प मुदतीचे तात्पुरते परवाने देण्यात येऊ नयेत.

 

तहसिलदार यांना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील तरतूदीनुसार ५०० ब्रास परिमाणापर्यंत गौण खनिजाचे अल्प,तात्पुरते परवाने देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. एखाद्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी संपूर्ण वर्षासाठी जेवढे गौण खनिज आवश्यक आहे, त्या गौण खनिजाचे एकत्रित परिमाण विचारात घ्यावे. तसेच एखाद्या व्यक्तीस किंवा संस्थेस वारंवार गौण खनिजाचे अल्प, तात्पुरते परवाने आवश्यक असतील तर त्याकरीता वर्षभरात आवश्यक असलेल्या एकूण गौण खनिजाचे परिमाण विचारात घ्यावे. अशा प्रकारे वर्षभराचे परिमाण निश्चित केल्यानंतर गौण खनिजाचे अल्प किंवा तात्पुरते परवान्याचे परिमाण ५०० ब्रासपेक्षा अधिक होत असल्यास त्यानुषंगाने अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करण्यासाठी परिमाणानुसार अधिकारीता असलेल्या जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तहसिलदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अल्प किंवा तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी. तथापि, एखाद्या व्यक्तीस अथवा संस्थेस परिमाणानुसार अधिकारीता असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने (जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी) थेट अर्ज करण्याची मुभा असेल.

 

अल्प मुदतीच्या परवान्यांसाठी जे क्षेत्र (सर्व्हे कमांक, गट क्रमांक) जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत, अशा क्षेत्रातून तहसीलदार यांनी एका वर्षांमध्ये एकदाच अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी. मात्र एखाद्या शेतकरी, गावकरी यांना विहीर बांधकाम किंवा घराच्या बांघकामासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८ मध्ये नमूद करण्यात आलेल्या मर्यादेत मुरूम, माती गौण खनिजासाठी अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही तहसिलदार यांना त्यांच्या अधिकारात करता येईल.

 

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या वडार व कुंभार समाजाच्या अधिकृत व्यक्तींना प्रचलीत नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या त्यांच्या करिताच्या वार्षिक मर्यादेत गौण खनिज उत्खननासाठी अल्प किंवा तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही तहसिलदार यांनी करावी. अल्प किंवा तात्पुरत्या परवानाद्वारे कोणत्याही वेळी खड्याची पृष्ठभागापासूनची खोली सहा मीटर (६ मीटर) पेक्षा अधिक असणार तसेच शासकीय जमिनीवर खनिपट्टे जाहीर लिलावा किंवा लिलावाव्दारे देण्यात येणारे असल्याने शासकीय जमिनीवर (पारंपारिक कुंभार व वडार समाजाचे व्यक्तीस नियमानुसार वगळून) इतरत्र अल्प किंवातात्पुरते परवाने दिले जाणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.

तहसीलदारांनी त्यांच्या संबंधित अधिकारितेच्या हद्दीतील ज्या क्षेत्रातून (गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक) ५०० ब्रासपेक्षा अधिक नसतील एवढ्या प्रमाणात गौण खनिज उत्खननाची वार्षिक मुदत संपल्यानंतर ई.टी.एस. मोजणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा व जास्तीचे उत्खनन झाले असल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्वामित्वधन भरून घेण्याची कार्यवाही अथवा दंडात्मक कारवाई करावी.

 

(सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या अधिकारितेच्या हद्दीतील ज्या क्षेत्रातून (गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक) उत्खननास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांनुषंगाने वर्षातून एकदा ई.टी.एस. मोजणी करुन मोजणीच्या अनुषंगाने अतिरिक्त उत्खनन आढळल्यास ७ दिवसाच्या आत खाणपट्टाधारकांना अतिरिक्त उत्खननाचे स्वामित्वधनाची रक्कम भरण्याची सूचना देण्यात यावी. स्वामित्वधनाची रक्कम ३० दिवसाच्या आत जमा करून घ्यावी. ३० दिवसात रक्कम जमा न केल्यास पुढील ७ दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात येवून दंड वसूल करण्यात यावा. परवान्यांची मुदत संपल्यानंतर उत्खनन क्षेत्राची खड्डयांचे संदर्भाने आवश्यक सुरक्षात्मक उपययोजना करणे व त्याचे अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधित परवानाधारकावर निश्चित करावी. गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीकरीता शासन वेळोवेळी निश्चित करेल त्या संगणक प्रणालीचा वापर करणे अनिवार्य राहील.

 

या सूचना जशाच्या तशा उपविभागीय अधिकारी यांना देखील लागू आहे. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तहसीलदार अथवा उप विभागीय अधिकारी यांच्याकडून अंमलबजावणी करण्यास कसूर केल्यास करणाऱ्या संबंधितांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अधिक माहितीकरिता शासन निर्णयाचे बारकाईने अवलोकन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने एस.एस.सी व एच.एस.सी . गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान….

महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने एस.एस.सी व एच.एस.सी . गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान….

संपादकीय,

 

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा पुणे 2025 /26 या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटना पुणे जिल्हा यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातून इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मध्ये प्रथम तीन विद्यार्थी व शाळेचा सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे .सदरचा कार्यक्रम हा दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी सकाळी दहा वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन राहुल सिनेमाजवळ इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गणपतराव मोरे साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या हस्ते तसेच औदुंबर उकिरडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व मारुती फडके साहेब उपायुक्त परीक्षा परिषद पुणे तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम गुरुकृपा सांस्कृतिक भवन राहुल सिनेमा जवळ इंदापूर येथे संपन्न होणार आहे. तरी इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांचा व पालकांचा सन्मान करण्यासाठी सन मार्च 2025/26 रोजी आपल्या प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण नावे खालील क्रमांकावर पाठवून देण्याची विनंती आहे .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर गणपतराव जी मोरे साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री औदुंबर उकिरडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व माननीय श्री मारुती फडके साहेब उप आयुक्त परीक्षा परिषद पुणे, तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब अडसूळ सर व सोलापूर जिल्हा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शेटे सर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमाची वेळ व्हाट्सअप ग्रुप तयार करून कळवण्यात येईल किंवा वैयक्तिक पण केले जातील ही विनंती आहे.

संपर्कासाठी मोबाईल नंबर..

दत्तात्रय गवळी सर…9689124302.

प्रवीण लोंढे..9922596672.

सागर घरत सर…9011850860

मोहन शिंदे सर…9860820903

दीपक वडापुरे सर….9096324832.

यावरील नंबर वर संपर्क करा.

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

 

पुणे, दि.११: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनात पुणे जिल्ह्यातील चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.

 

जिल्हा स्तरावर येणाऱ्या तक्रार अर्जांवर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात उचित कार्यवाही होणे आवश्यक असून त्यासाठी निर्णय देताना नियम व कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे, अशा सूचना डॉ.पुलकुंडवार यांनी दिल्या.

 

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल चार प्रकरणांचा समावेश होता. या अर्जदारांना तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतच्या कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन श्री. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

संपादकीय ,

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार माने सर संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा आयोजित करण्यात आला. नर्सरी पासून बारावीपर्यंतची विद्यार्थी तसेच चेतना कॉलेजचे प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ यावेळी उत्साहाने उपस्थित होते यावेळी युवराज शिंदे सर यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व इतिहास थोडक्यात सांगितला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड तानाजी देवकर साहेब यांनी कामगार दिनाचे महत्त्व तसेच महाराष्ट्र दिन आणि सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक केले त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयी माहिती दिली तसेच प्राचार्य मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शिक्षकांना सूचना केल्या व शिक्षकांचे कौतुक केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यास माधुरी चव्हाण मॅडम आणि पोर्णिमा थोरे मॅडम यांनी मदत केली आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले आणि सूत्रसंचालन गोळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव,’एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, नगरसेवक, पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पद यात्रेचे निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने यात्रेला नाकारल्यामुळे सर्व साधुसंत आखाड्यावरील नाथ भक्त इंदापूर, जिल्हा पुणे येथून आक्रमक…

अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पद यात्रेचे निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने यात्रेला नाकारल्यामुळे सर्व साधुसंत आखाड्यावरील नाथ भक्त इंदापूर जिल्हा पुणे येथून आक्रमक…

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

संपादकीय,

पुणे, दि. १७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-2026) ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यास २४ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविली आहे.

error: Content is protected !!