Home Blog

महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिव पदी सौ. ललिता कटके यांची नियुक्ती.

महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिव पदी सौ. ललिता कटके यांची नियुक्ती.

महाराष्ट्र राज्य वुशू पंच व ज्युरी कोर्सचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

महाराष्ट्र वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप खर्डेकर तर सचिव पदी सौ. ललिता कटके यांची नियुक्ती केल्याचे वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव सोपानराव कटके यांनी जाहीर केले.

ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य वुशू रेफ्री अँड जजेस कोर्स २०२६” चे उद्घाटन सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य डोणजे गावातील प्रथमेश गो क्रेझी रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडले.चार दिवस चाललेल्या ह्या निवासी प्रशिक्षण कोर्स चे आयोजन “महाराष्ट्रातील वुशू पंचांच्या गुणवत्तावृद्धीसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे” असे सोपानराव कटके म्हणाले.

उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी श्री. संदीपजी खर्डेकर अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी महाराष्ट्रात वुशू खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशिक्षित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच तयार होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी या प्रशिक्षण शिबिराचे कौतुक करत सहभागी पंचांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी बोलताना संदीप खर्डेकर यांनी “शिवछत्रपती अवार्ड विजेते आणि अंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळाडू सोपानराव कटके सरांचा “वुशू” खेळाच्या प्रचार प्रसारात मोठा वाटा असून आम्ही त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करू असे जाहीर करतानाच कटके सरांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी सोपानराव एस. कटके,संयुक्त सचिव, वुशू असोसिएशन ऑफ इंडिया,यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक नियमांची सखोल माहिती देत पंचांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला.

तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत खेळ आणि खेळाडू घडविण्यात पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सचिव ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन तथा संचालिका, रिया इंटरनॅशनल स्कूल सौ. ललिता कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पंच, प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षकांचे स्वागत करून या कोर्सची उद्दिष्टे स्पष्ट केली.

या उद्घाटन सोहळ्यास टार्गेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सरचिटणीस दादासाहेब भोरे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीला अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले.

विशेष बाब म्हणजे, वुशूच्या सांडा (Sanda) प्रकारासाठी श्री. ललित कुमार आणि ताओलू (Taolu) प्रकारासाठी श्री. अभिजीत ऐसवाल यांची अधिकृत प्रशिक्षक व परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली व त्यांनी प्रशिक्षणार्थींना आधुनिक पंचगिरीचे प्रशिक्षण दिले.

पाच दिवस चाललेल्या या निवासी शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले १०० हून अधिक पंच, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व वुशू पदाधिकारी सहभागी झाले. अत्याधुनिक पंचगिरीचे नियम, स्पर्धा संचालन, गुणांकन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निर्णय प्रक्रिया यांचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे.

या प्रशिक्षण शिबिरामुळे महाराष्ट्राला आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सक्षम, प्रशिक्षित आणि दर्जेदार पंचांची फळी उपलब्ध होणार असून, राज्यातील वुशू खेळाच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

या शिबिरास शिवछत्रपती अवॉर्ड विजेते संदीप शेलार, तृप्ती चांदवडकर, प्रतीक्षा शिंदे इ खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वुशू असोसिएशन च्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष जयंत घैसास, सचिव सौ. ललिता कटके,कोषाध्यक्ष साधना शेलार,तर रमा हटकर, सुनील शेंडे, तृप्ती चांदवडकर,उर्मिला कुटे, माधव शैरीकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे सोपानराव कटके यांनी जाहीर केले.

गौण खनिज उत्खननासाठी अल्प मुदतीच्या परवान्याबाबत शासन निर्णय जारी उप विभागीय अधिकारी व तहसीलदारांना कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

गौण खनिज उत्खननासाठी अल्प मुदतीच्या परवान्याबाबत शासन निर्णय जारी

उप विभागीय अधिकारी व तहसीलदारांना कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि. २०: महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ च्या नियम ५८ व ५९ अन्वये अल्प मुदतीचे परवाने तहसीलदार यांच्या स्तरावरून देतांना महसूल व वन विभागाच्या १९ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.

 

गौण खनिज उत्खननासाठी तात्पुरते परवाने मिळवण्याकरीता तहसिलदार यांचेकडे अर्ज प्राप्त झाल्यास सदर *सर्व्हे कमांक , गट क्रमांक* हा नियम ५८ अन्वये जिल्हा खाणकाम योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा कसे यांची त्यांनी खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.

अल्प मुदतीचे, तात्पुरते परवाने हे जिल्हा खाणकाम योजनेत नियम ५८ अन्वये समितीच्या मान्यतेअंती समावेश केला असेल केवळ अशा क्षेत्रावर देण्यात (स.नं./ग.नं.) यावेत. समावेश करण्यासाठी प्रस्तावित अथवा विचाराधीन असलेल्या क्षेत्रावर किंवा ज्या क्षेत्रावर खाणपट्टा मंजूर करण्यात आलेला आहे अशा क्षेत्रावर अल्प मुदतीचे, तात्पुरते परवाने देण्यात येवू नयेत. तसेच समितीने एखाद्या विभागाची ना-हरकत प्राप्त करून घेण्याच्या अधीन राहून मान्यता दिली असल्यास हे ना-हरकत प्राप्त झाल्याशिवाय अल्प मुदतीचे तात्पुरते परवाने देण्यात येऊ नयेत.

 

तहसिलदार यांना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मधील तरतूदीनुसार ५०० ब्रास परिमाणापर्यंत गौण खनिजाचे अल्प,तात्पुरते परवाने देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. एखाद्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी संपूर्ण वर्षासाठी जेवढे गौण खनिज आवश्यक आहे, त्या गौण खनिजाचे एकत्रित परिमाण विचारात घ्यावे. तसेच एखाद्या व्यक्तीस किंवा संस्थेस वारंवार गौण खनिजाचे अल्प, तात्पुरते परवाने आवश्यक असतील तर त्याकरीता वर्षभरात आवश्यक असलेल्या एकूण गौण खनिजाचे परिमाण विचारात घ्यावे. अशा प्रकारे वर्षभराचे परिमाण निश्चित केल्यानंतर गौण खनिजाचे अल्प किंवा तात्पुरते परवान्याचे परिमाण ५०० ब्रासपेक्षा अधिक होत असल्यास त्यानुषंगाने अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करण्यासाठी परिमाणानुसार अधिकारीता असलेल्या जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तहसिलदारांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अल्प किंवा तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी. तथापि, एखाद्या व्यक्तीस अथवा संस्थेस परिमाणानुसार अधिकारीता असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने (जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी) थेट अर्ज करण्याची मुभा असेल.

 

अल्प मुदतीच्या परवान्यांसाठी जे क्षेत्र (सर्व्हे कमांक, गट क्रमांक) जिल्हा खाणकाम योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत, अशा क्षेत्रातून तहसीलदार यांनी एका वर्षांमध्ये एकदाच अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही करावी. मात्र एखाद्या शेतकरी, गावकरी यांना विहीर बांधकाम किंवा घराच्या बांघकामासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८ मध्ये नमूद करण्यात आलेल्या मर्यादेत मुरूम, माती गौण खनिजासाठी अल्प, तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही तहसिलदार यांना त्यांच्या अधिकारात करता येईल.

 

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या वडार व कुंभार समाजाच्या अधिकृत व्यक्तींना प्रचलीत नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या त्यांच्या करिताच्या वार्षिक मर्यादेत गौण खनिज उत्खननासाठी अल्प किंवा तात्पुरते परवाने देण्याची कार्यवाही तहसिलदार यांनी करावी. अल्प किंवा तात्पुरत्या परवानाद्वारे कोणत्याही वेळी खड्याची पृष्ठभागापासूनची खोली सहा मीटर (६ मीटर) पेक्षा अधिक असणार तसेच शासकीय जमिनीवर खनिपट्टे जाहीर लिलावा किंवा लिलावाव्दारे देण्यात येणारे असल्याने शासकीय जमिनीवर (पारंपारिक कुंभार व वडार समाजाचे व्यक्तीस नियमानुसार वगळून) इतरत्र अल्प किंवातात्पुरते परवाने दिले जाणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी.

तहसीलदारांनी त्यांच्या संबंधित अधिकारितेच्या हद्दीतील ज्या क्षेत्रातून (गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक) ५०० ब्रासपेक्षा अधिक नसतील एवढ्या प्रमाणात गौण खनिज उत्खननाची वार्षिक मुदत संपल्यानंतर ई.टी.एस. मोजणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा व जास्तीचे उत्खनन झाले असल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्वामित्वधन भरून घेण्याची कार्यवाही अथवा दंडात्मक कारवाई करावी.

 

(सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या अधिकारितेच्या हद्दीतील ज्या क्षेत्रातून (गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक) उत्खननास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांनुषंगाने वर्षातून एकदा ई.टी.एस. मोजणी करुन मोजणीच्या अनुषंगाने अतिरिक्त उत्खनन आढळल्यास ७ दिवसाच्या आत खाणपट्टाधारकांना अतिरिक्त उत्खननाचे स्वामित्वधनाची रक्कम भरण्याची सूचना देण्यात यावी. स्वामित्वधनाची रक्कम ३० दिवसाच्या आत जमा करून घ्यावी. ३० दिवसात रक्कम जमा न केल्यास पुढील ७ दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात येवून दंड वसूल करण्यात यावा. परवान्यांची मुदत संपल्यानंतर उत्खनन क्षेत्राची खड्डयांचे संदर्भाने आवश्यक सुरक्षात्मक उपययोजना करणे व त्याचे अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधित परवानाधारकावर निश्चित करावी. गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीकरीता शासन वेळोवेळी निश्चित करेल त्या संगणक प्रणालीचा वापर करणे अनिवार्य राहील.

 

या सूचना जशाच्या तशा उपविभागीय अधिकारी यांना देखील लागू आहे. याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तहसीलदार अथवा उप विभागीय अधिकारी यांच्याकडून अंमलबजावणी करण्यास कसूर केल्यास करणाऱ्या संबंधितांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अधिक माहितीकरिता शासन निर्णयाचे बारकाईने अवलोकन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने एस.एस.सी व एच.एस.सी . गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान….

महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने एस.एस.सी व एच.एस.सी . गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान….

संपादकीय,

 

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा पुणे 2025 /26 या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटना पुणे जिल्हा यांच्यावतीने पुणे जिल्ह्यातून इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मध्ये प्रथम तीन विद्यार्थी व शाळेचा सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे .सदरचा कार्यक्रम हा दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी सकाळी दहा वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन राहुल सिनेमाजवळ इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गणपतराव मोरे साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या हस्ते तसेच औदुंबर उकिरडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व मारुती फडके साहेब उपायुक्त परीक्षा परिषद पुणे तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम गुरुकृपा सांस्कृतिक भवन राहुल सिनेमा जवळ इंदापूर येथे संपन्न होणार आहे. तरी इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांचा व पालकांचा सन्मान करण्यासाठी सन मार्च 2025/26 रोजी आपल्या प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण नावे खालील क्रमांकावर पाठवून देण्याची विनंती आहे .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर गणपतराव जी मोरे साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री औदुंबर उकिरडे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व माननीय श्री मारुती फडके साहेब उप आयुक्त परीक्षा परिषद पुणे, तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब अडसूळ सर व सोलापूर जिल्हा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शेटे सर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमाची वेळ व्हाट्सअप ग्रुप तयार करून कळवण्यात येईल किंवा वैयक्तिक पण केले जातील ही विनंती आहे.

संपर्कासाठी मोबाईल नंबर..

दत्तात्रय गवळी सर…9689124302.

प्रवीण लोंढे..9922596672.

सागर घरत सर…9011850860

मोहन शिंदे सर…9860820903

दीपक वडापुरे सर….9096324832.

यावरील नंबर वर संपर्क करा.

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

 

पुणे, दि.११: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनात पुणे जिल्ह्यातील चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.

 

जिल्हा स्तरावर येणाऱ्या तक्रार अर्जांवर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात उचित कार्यवाही होणे आवश्यक असून त्यासाठी निर्णय देताना नियम व कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे, अशा सूचना डॉ.पुलकुंडवार यांनी दिल्या.

 

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल चार प्रकरणांचा समावेश होता. या अर्जदारांना तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतच्या कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन श्री. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

संपादकीय ,

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार माने सर संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा आयोजित करण्यात आला. नर्सरी पासून बारावीपर्यंतची विद्यार्थी तसेच चेतना कॉलेजचे प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ यावेळी उत्साहाने उपस्थित होते यावेळी युवराज शिंदे सर यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व इतिहास थोडक्यात सांगितला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड तानाजी देवकर साहेब यांनी कामगार दिनाचे महत्त्व तसेच महाराष्ट्र दिन आणि सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक केले त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयी माहिती दिली तसेच प्राचार्य मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शिक्षकांना सूचना केल्या व शिक्षकांचे कौतुक केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यास माधुरी चव्हाण मॅडम आणि पोर्णिमा थोरे मॅडम यांनी मदत केली आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले आणि सूत्रसंचालन गोळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव,’एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, नगरसेवक, पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पद यात्रेचे निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने यात्रेला नाकारल्यामुळे सर्व साधुसंत आखाड्यावरील नाथ भक्त इंदापूर, जिल्हा पुणे येथून आक्रमक…

अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पद यात्रेचे निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने यात्रेला नाकारल्यामुळे सर्व साधुसंत आखाड्यावरील नाथ भक्त इंदापूर जिल्हा पुणे येथून आक्रमक…

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

संपादकीय,

पुणे, दि. १७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-2026) ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यास २४ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविली आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या डी- फार्मसी अभ्यासक्रम प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या डी- फार्मसी अभ्यासक्रम प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न

संपादकीय,

चेतना फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, येथे द्वितीय वर्ष डी-फार्मसी विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रास्ताविका मध्ये कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. निरोप समारंभ हा केवळ निरोप देण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, कविता व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील अनुभव, आठवणी आणि भावना व्यक्त करताना आपले मनोगत मांडले, ज्यामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रामाणिकपणा, सेवा भाव आणि नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले. “फार्मसी क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून मानव सेवेचे माध्यम आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आरोग्यासाठी करा,” असे ते म्हणाले.

तसेच वर्गशिक्षिका प्रा. तनुजा काशीद, डीन अकॅडमिक्स प्रा. गीतांजली कांबळे आणि प्रा. चिंतामणी रणवरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन आकर्षक पद्धतीने पार पडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट आयोजन प्रा. प्राजक्ता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष डी-फार्मसी विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या परिश्रमा मुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

संस्थेचे खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने सर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देताना, कॉलेजमध्ये मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि मैत्री हीच त्यांच्या आयुष्यभराची अमूल्य संपत्ती असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी आठवणींचा ठेवा निर्माण करून गेला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर’च्या सहकार्याने पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर’च्या सहकार्याने पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्न

संपादकीय,

इंदापूर: येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर यांच्या सहकार्याने पूल कॅम्पस ड्राइव्ह – २०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले।

या पूल कॅम्पस ड्राइव्हचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर टीम तसेच पूल कॅम्पस ड्राइव्हसाठी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर चेतना फाउंडेशनचे खजिनदार सोमनाथ माने सर यांनीही उपस्थितांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या. पुढे वेलनेस फॉरएव्हरच्या मयूर डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस ड्राइव्ह बाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मिलिंद कवितके, अश्विनी कवितके, आणि रोहित उराडे (वेलनेस फॉरएव्हर, इंदापूर शाखा) हे उपस्थित होते।

तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के, विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश सोनवणे, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. प्राजक्ता गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।

या उपक्रमामध्ये डी.फार्म व बी.फार्म विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थी फार्मासिस्ट व वैद्यकीय प्रतिनिधी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. निवड प्रक्रिया समूहचर्चा व मानव संसाधन मुलाखत या टप्प्यांद्वारे पार पडली।

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये जवळील विविध फार्मसी महाविद्यालयांमधून एकूण १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी ३ विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट पदासाठी निवड करण्यात आली असून त्यांना वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे।

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व आवश्यक कौशल्यां बाबत मार्गदर्शन मिळाले।

प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना अशा संधींचा लाभ घेऊन आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करण्याचे आवाहन केले।

या स्तुत्य उपक्रमास चेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने व सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रुचिता भंडारी यांनी केले.

error: Content is protected !!