Home Blog Page 3

जिल्हा परिषद व पंचायत समिती (इंदापूर) सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 07/02/2026 रोजी झालेल्या मतदानाची आकडेवारी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 दिनांक 07/02/2026 रोजी झालेल्या मतदानाची आकडेवारी
*एकूण (321002)-210788(65.67%)*

*66-भिगवण*
131 भिगवण (21083)-13567(64.35%)
132 शेटफ़ळगढे (20907)-14723(70.42%)
एकूण (41990)-28290(67.37%)

*67-पळसदेव*
133 पळसदेव (18508)-12313(66.53%)
134 बिजवडी (22674)-15886(70.06%)
एकूण (41182)-28199(68.47%)

*68-वडापूरी*
135 माळवाडी (18718)-13632(72.83%)
136 वडापूरी (17928)-13395(74.72%)
एकूण (36646)-27027(73.75%)

*69-निमगांव केतकी*
137 निमगांव केतकी (19018)-13125(69.01%)
138 शेळगांव (20880)-13237(63.4%)
एकूण (39898)-26362(66.07%)

*70-वालचंदनगर*
139 बोरी (20506)-12480(60.86%)
140 वालचंदनगर (21469)-11051(51.47%)
एकूण (41975)-23531(56.06%)

*71-लासुर्णे*
141 लासुर्णे (21726)-11803(54.33%)
142 सणसर (22284)-11099(49.81%)
एकूण (44010)-22902(52.04%)

*72-काटी*
143 काटी (19355)-14967(77.33%)
144 लाखेवाडी (19187)-14282(74.44%)
एकूण (38542)-29249(75.89%)

*73-बावडा*
145 बावडा (19566)-13105(66.98%)
146 लुमेवाडी (17193)-12123(70.51%)
एकूण (36759)-25228(68.63%)

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संपादकीय

 

पुणे, दि. ६: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील बारामती, मावळ, मुळशी, शिरुर, हवेली, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तालुक्यात तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या ३० जानेवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी.) मधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तेथे दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.

 

कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने मालकांनी, व्यवस्थापनाने परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन करण्याची खबरदारी घ्यावी. आपल्या आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द मा. निवडणूक आयोग व शासनाने निर्देशित केल्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास कामगार उप आयुक्त कार्यालयाच्या dycl2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर आस्थापनेचे नाव, जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करुन तक्रार दाखल करावी.

 

यासंदर्भात अधिक माहिती व तक्रारीकरिता सहाय्यक कामगार आयुक्त प्रविण बा. जाधव-९५२९६११८०७, ग. स. शिंदे-९७३०१२११५२, द. दा. पवार- ९८२२७३३३७०, सु. तु. शिर्के- ७७७५९६६६०६, के. ल. मुजमुले ९८२३९९७७२२ आणि सरकारी कामगार अधिकारी मकरंद पाटील ९५७९२५१३३०, श्री.ह.चोभे ८९७२६८५५२१, शंकर माळी ९८२०५०४५२७, संपत गुजांळ ९४२०६२९२१७ आणि एस.के.आव्हाड ९८२२४३३२५८ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

 

निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

निवडणुकांची रणधुमाळी एकीकडे तर मारुतीरायांच्या संकेत एकीकडे

संपादकीय

दिनांक ४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहत असताना सर्वच पक्षांचे सर्वच उमेदवार गावोगाव फिरून विकासाचे, भावनिक सामाजिक मुद्दे मांडत मतदार बंधू-भगिनींकडे मतदान करण्याची मागणी करत आहेत. लोकशाहीची खरी ताकद याच दिवसात समजते.

 

अगदी याच प्रमाणे परंपरागत सुरू असलेल्या काही सामाजिक रूढी आणि परंपरा यांचे मान्यतेनुसार गावचा राजा हा त्या गावचा ग्रामदैवत असतो. मौजे लाखेवाडी येथे दिनांक चार ४ फेब्रुवारी सुमारे दोन अडीच वाजता या गावचे ग्रामदैवत बजरंग बली मारुती राया यांच्याकडून काही संकेत देण्यात आले. ते नेमके कशाच्या संकेत होते लगेच तर कोणी सांगू शकत नाही. रोजच्याप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये लोकांची गर्दी सुरू होती पोस्ट मास्तर सर्वांची कामे करून देत व्यस्त होते. रस्त्याने वाहने वाहत होती लोकांची पाणी ने आण सुरू होती. अचानक वारा पाऊस गडगडात असे काही नसतं ना ग्रामदैवत मारुतीरायांच्या कळसाच्या पडण्याचा जोरदार आवाज आला. प्रत्यक्षदर्शी आठ दहा माणसे असतील. गावचे सेवेकरी म्हणा नेमलेली मंडळी म्हणा यांच्याकडून ते गोळा करून व्यवस्थित ठेवण्यात आले. त्यानंतर एक स्थिर शांतता आणि भकास वातावरण अशी जाणीव झाली अशी तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

 

गावचे ग्रामस्थ, जानकर मंडळी, वारकरी संप्रदाय, वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी जो तो आपल्या आपल्या सोयीने याचे तर्क वितर्क लावून अनुमान लावण्यात व्यस्त आहे. अध्यात्माची आवड असणारे तसेच निस्वार्थी भावनेने सेवा करणारे अशा काही लोकांच्या भावना आहात झाले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एक सावध होण्याचे संकेत असावे.

 

बाकी हे संकेत कशाचे हे सध्या तर कोणी सांगू शकत नाही येणारा काळ आणि वेळ हे दाखवून देईल.

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेन प्रणालीवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी- जिल्हा क्रीडा अधिकारी

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता

क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेन प्रणालीवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी- जिल्हा क्रीडा अधिकारी

पुणे, दि. ३: गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक व जलद आणी त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ८ जानेवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे.

ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूपर्यंत पोहोचण्यासाठी शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यादृष्टीन पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

*क्रीडा संघटनेने करावयची कार्यवाही:* राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी अभिलेख जतनाकरिता स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणी गुणपत्रिका विहित नमुन्यात “xlsx “ फाईल “क्रीडा ई प्रमाण” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करण्यासाठी संचालनालयास सादर करणे क्रीडा संघटनावर बंधनकारक आहे. ही माहिती संबधीत संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांने डीजीटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत माहिती ‘ब्लॉक चेन’वर अपलोड न करणाऱ्या संघटना स्मार्ट कॉन्टॅक्टद्वारे स्वंयचलीतरित्या डिफॉल्टर यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या संघटनेची राहील.

*खेळाडूच्या नोंदणी प्रक्रियेकरिता विशेष मोहीम:* खेळाडूंनी आपल्या ‘क्रीडा ई प्रमाण’” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) आपल्या आधार संलग्न आयडीद्वारे लॉगीन करुन नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी सादर केलेली माहिती आणी संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला, हॅश यांची प्रणालीद्वारे स्वंयचलीत पडताळणी होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

*अपिलीय तरतूद:* तांत्रिक कारणास्तव एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र नांमजूर झाल्यास तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडूस प्रमाणपत्र न मिळाल्यास ३० दिवसांच्या आत ऑनलाईनपद्धतीने अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासन निर्णयान्वये जुनी कागदपत्रावर आधारीत पडताळणी प्रक्रिया बंद करुन पुर्णत: डिजीटल क्रीडा ई प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाच्या लाभ मिळण्याच्यादृष्टीने क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेनवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

मतदान जनजागृती अभियानात साडेचार लाखाहून अधिक मतदारांचा सहभाग-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदान जनजागृती अभियानात साडेचार लाखाहून अधिक मतदारांचा सहभाग-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ४: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आयोजित १४ हजार २१६ उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ७८ हजार २८८ इतक्या मतदारांनी सहभाग घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावाख् असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

बारामती तालुक्यात ४० हजार, मावळ ६९ हजार ७९०, मुळशी ४३ हजार ८३५, शिरुर ७० हजार ३५६, हवेली ३३ हजार ५६८, दौंड ३४ हजार ४१९, इंदापूर २ हजार ९९८, पुरंदर १ हजार ६२७, भोर ६ हजार ८५६, वेल्हे २५ हजार २९६, आंबेगाव ६० हजार २२३, जुन्नर ८१ हजार ५०० आणि खेड तालुक्यात ७ हजार ८२० असे एकूण ४ लाख ७८ हजार २८८ मतदारांनी सहभाग घेतला आहे

मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट १ हजार ७७५, पदयात्रा- ६६ हजार ६३१, कलापथक, पथनाट्य ८ हजार ९५७, सायकल यात्रा१५ हजार ४३१, मानवी साखळी १४ हजार ९०३, मतदारांना शपथ १ लाख २६ हजार ७७०, गृहभेटी ४१ हजार ३१५, महिलांकरिता मतदान जागृती विशेष कार्यक्रम ३२ हजार ३६८, स्टेटस दिवस, सेल्फी दिवस, समाज माध्यमांचा वापर ७ हजार १६८, प्रभातफेरी, मतदार जागृती फेरी ८० हजार ८३९, चित्रकला स्पर्धा २३ हजार ६८०, रांगोळी २० हजार २३९, इतर (संकल्पपत्र) ३८ हजार २१२ असे एकूण १४ हजार २१६ उपक्रमाच्या माध्यमातून मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

 

५ फेब्रुवारी रात्री १० वाजता प्रचाराची समाप्ती

संपादकीय

पुणे, दि. ४ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करु नयेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे.

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत असून, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम २८ ब (१) अन्वये, “कोणतीही व्यक्ती कोणत्याही मतदार विभागामध्ये, मतदानास सुरुवात होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तासांमध्ये किंवा त्या मतदार विभागात निवडणुकीसाठी ज्या दिनांकास किंवा दिनांकास मतदान घेण्यात येईल. त्या दिनांकास किंवा दिनाकांस कोणतीही सार्वजनिक सभा बोलविणार नाही, भरविणार नाही किंवा अशा सभेस हजर राहणार नाही.

 

राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, २०२५’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद १६ (घ) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, परिच्छेद १६ (ग) अन्वये ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही,अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. ३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आवेदनपत्र नियमित शुल्कासह भरण्यास १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in व http://puppssmsce.in या संकेतस्थळावर विलंब शुल्कासह १४ ते २० फेब्रुवारी, अतिविलंब शुल्कासह २१ ते २४ फेब्रुवारीपर्यंत तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह २५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येतील. २८ फेब्रुवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

 पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

संपादकीय

पुणे, दि. ३ फेब्रुवारी : (जिल्हा वृत्तसेवा) : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोट कलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

मुंबई, दि.१: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून ही बाब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

 

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती क्षेत्रात एआय धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच राज्याच्या कृषी विभागाने ‘महा-विस्तार’ अ‍ॅप विकसित केले आहे. याच दिशेने पुढचे पाऊल टाकत केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ‘Bharat Vistar’ नावाचे एआय-आधारित बहुभाषिक कृषी सहाय्यक साधन जाहीर केले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत योग्य वेळी हवामान, पीक नियोजन, कीड-रोग नियंत्रण आणि बाजारपेठेची माहिती मिळणार असून निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होईल. डिजिटल शेतीच्या विकासाची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येते.

 

उच्च मूल्य पिके, पीक विविधीकरण, मत्स्यव्यवसायात व पशुपालन, सिंचन तसेच एआयसारख्या तंत्रज्ञानाधारित शेतीवर दिलेला भर स्वागतार्ह आहे. कापसाचे उत्पादन व गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकार विशेष योजना राबवणार आहे. फलोत्पादनाला चालना देण्यासाठी नारळ, चंदन व काजू यांसारख्या उच्च मूल्य नगदी पिकांचे उत्पादन वाढवले जाणार असून काजू व कोको यांना जागतिक ब्रँड म्हणून उभारणी करण्यावर भर देण्यात आला आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी देशभरात ५०० नवीन ‘अमृत जलाशय’ उभारले जाणार असून यामुळे मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच मत्स्य संपदा योजनेचा विस्तार करून मत्स्य विक्रेते व सूक्ष्म उद्योगांसाठी ६,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील काळात १० दशलक्ष शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी सरकार मदत करणार असून, काढणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी विकेंद्रित साठवणूक क्षमता निर्माण केली जाणार आहे.

 

२०२६-२७ च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतीय शेती अधिक शाश्वत व फायदेशीर बनवण्यासाठी युरिया अनुदान प्रणालीत सुधारणा, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पोषक तत्त्वांवर आधारित मॉडेल स्वीकारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कृषी निर्यातीसाठी स्थिर व दीर्घकालीन निर्यात धोरण ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

 

तसेच अॅग्री बिझनेस नेटवर्कसाठी १६७ कोटी रुपये, उपसा सिंचन योजनांच्या सौर ऊर्जिकीकरणासाठी २०७ कोटी रुपये आणि कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेसाठी ६४६ कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली असून या बाबी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

 

शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन या परस्परपूरक घटकांसाठी भरीव तरतुदी व योजनांची घोषणा करण्यात आल्याने या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन त्यांचा सर्वांगीण विस्तार होईल. केंद्र व राज्य सरकार समन्वयाने काम करत असताना, या अर्थसंकल्पातील तरतुदींचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कटिबद्ध आहे.

 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीला नफ्याचा व्यवसाय बनवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राला शेती क्षेत्रात विकासाची नवी झेप घेण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितच महत्त्वाचा ठरेल.

विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प – पणनमंत्री जयकुमार रावल

विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प – पणनमंत्री जयकुमार रावल

संपादकीय 

मुंबई, दि.1 :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देणारा, सर्वसमावेशक आणि देशाच्या दीर्घकालीन विकासाची स्पष्ट दिशा मांडणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली. या अर्थसंकल्पातून ग्रामीण व शहरी विकासातील समतोल, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विस्तार आणि आत्मनिर्भर भारत या चारही क्षेत्रांना एकाच वेळी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा अर्थसंकल्प केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून शेतमालाची विक्री, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी वाढवणारा असल्याने कृषी पणन व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पात कृषी व कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देताना शेतमाल थेट बाजारपेठेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. ‘एक जिल्हा- एक उत्पादन’ या संकल्पनेमुळे स्थानिक पातळीवरील शेतमाल, प्रक्रिया केलेली उत्पादने आणि हस्तकला वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असून याचा थेट फायदा शेतकरी व उत्पादक समूहांना होणार आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांच्या मालाला स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होईल, असे मंत्री रावल यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वाढता वापर हा कृषी पणन व्यवस्थेतही क्रांतिकारक बदल घडवणारा ठरेल. उत्पादनाचा अंदाज, मागणी-पुरवठा विश्लेषण, किमतींचे पूर्वानुमान आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक सक्षम झाल्याने बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढेल. यामुळे शेतमालाची साठवणूक, वाहतूक व विक्री अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधांमधील मोठ्या गुंतवणुकीमुळे शेतमालाची जलद व सुरक्षित वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे निर्यात साखळी अधिक सक्षम होईल. विशेषतः फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ व मत्स्यउत्पादनांच्या बाजारपेठेसाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे, असे मंत्री रावल यांनी नमूद केले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाचा विस्तार करून महिलांना केवळ स्वयंरोजगारापुरते मर्यादित न ठेवता सक्षम उद्योजक बनवण्याचा सरकारचा ठाम निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसतो. क्लस्टर-स्तरीय फेडरेशन व समुदाय-मालकीच्या किरकोळ विक्री केंद्रांमुळे महिला उद्योजकतेला नवे बळ मिळणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय हातमाग धोरण, खादी व ग्रामोद्योगांना दिलेले प्रोत्साहन आणि मेगा टेक्सटाईल पार्कच्या स्थापनेमुळे कृषी आधारित उद्योगांना चालना मिळेल. कापूस, रेशीम, लोकर यांसारख्या कृषी कच्च्या मालाला स्थानिक पातळीवर प्रक्रिया व विक्रीच्या संधी निर्माण होतील. यामुळे ग्रामीण भागातच मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. मत्स्यपालन क्षेत्रातील जलाशयांचा विकास आणि मच्छिमारांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचा निर्णय हा कृषी पणन व्यवस्थेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. थेट विक्री व्यवस्थेमुळे मच्छिमारांना योग्य दर मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

एकूणच हा अर्थसंकल्प कृषी उत्पादनाबरोबरच पणन व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि मूल्यसाखळी यांना बळ देणारा आहे. शेतकरी, उत्पादक संघटना आणि कृषी बाजार समित्यांसाठी हा अर्थसंकल्प नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!