Home Blog Page 2

मंत्री मंडळ निर्णय 2026

मंत्री मंडळ निर्णय 2026

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू, अर्थसंकल्प 6 मार्च रोजी सादर होणार

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.

राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, 23 फेब्रुवारी ते बुधवार, 25 मार्च 2026 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. तसेच 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठक, विधानपरिषद आणि विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिवेशन काळात शनिवार, 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज होणार आहे आणि सोमवार, 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. 19 मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच 20 मार्च रोजी देखील विधिमंडळ कामकाज होणार नाही.

अधिवेशनामध्ये येणारे महत्त्वाचे विषय!

 

● संयुक्त राष्ट्र संघाने सन 2026 हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा केली जाणार.

● जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार.

● मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार.

● सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रनिर्मितीचा वसा जोपासणारा अनुलोम परिवार…

राष्ट्रनिर्मितीचा वसा जोपासणारा अनुलोम परिवार…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येवला, नाशिक येथे अनुगामी लोकराज्य अभियानांतर्गत कापसे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘अनुलोम संगम-2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी समर्पणाची भावना अत्यंत महत्त्वाची असून, अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून कार्य करत आहेत, ही बाब प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांनुसार समाजातील अडचणी दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून प्रभावीपणे होताना दिसत आहे. चांगली समाजनिर्मिती हीच या कार्यामागील प्रेरणा आहे.

अनुलोमने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व घडवण्याचे कार्य हाती घेतले असून, प्रगतिशील आणि समरस समाज उभारण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून भेदभावरहित, एकजूट समाजनिर्मितीचे कार्य सुरू असून संवादिनी उपक्रमाद्वारे यामध्ये 500 महिला स्वयंसेवक सहभागी झाल्या आहेत, हे समरसतेचेच उदाहरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

समाजात अनुलोमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हा परिवार अधिक व्यापक व्हावा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अनुलोमचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमादरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जनसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.

निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालये संवर्गाचा निकाल आज जाहीर होत आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे, सांगली, ठाणे, नागपूर व नाशिक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले!

सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.

उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समिती कडून कांदलगाव येथे बैठकीचे आयोजन

उजनी  धरणग्रस्त  बचाव संघर्ष समिती यांचेकडून शेतकरी मच्छीमार बांधवांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्व धरणग्रस्त व मच्छीमार बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे

यामध्ये प्रामुख्याने 1)शासन निर्णय 17 जून 2019 व शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2025 रद्द झाला पाहिजे 2) शेतकरी उजनी संपादित जमीन पूर्वपरंपरा गत वहिवाट करीत असून त्यावर आपली उपजीविका करत आहे ती जमीन वाचली पाहिजे 3) उजनी धरणातील जलसाठ्यामुळे मच्छिमार करणारे लोक मच्छीमारी करून आपली उपजीविका करीत आहेत त्यांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे 4) संपादित जमिनी शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती खाजगी कंपन्यांना किंवा उद्योगपतींना देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे 5) महाराष्ट्र शासनाने धरणासाठी  संपादित केलेली परंतु अध्यापन वापरलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत किंवा करारावर द्यावी अशी आणि विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सात वाजता कांदलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी संघर्ष समितीच्या वतीने सर्व शेतकरी बांधव मच्छीमार बांधव यांना उपस्थित राहण्याचे नम्र विनंती

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादकीय

मुंबई, दि. ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.

राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात.मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या.

पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न.

प्रतिनिधी : रोहन घोगरे

बावडा दि. 9 स्वप्नांना सीमा नसते. ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे संयम असला पाहिजे. नेतृत्व म्हणजे स्वतःसाठी मार्ग तयार करणे नाही तर इतरांसाठी पूल बांधणे आहे. त्यासाठी विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन दशेतूनच तयारी केली पाहिजे. असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्वाती चौगुले यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये सोमवार (दि. 9) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. शिक्षण विशेषतः मुलींचे कोणत्याही कारणामुळे थांबता कामा नये असेही त्या म्हणाल्या. त्यासाठी असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रवीण घोगरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहु वावरे उपस्थित होते. स्त्रिया आता कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत. मोठमोठ्या कंपनीच्या सीईओ पदी सुद्धा स्त्रिया विराजमान झालेल्या आहेत. तर अंतराळात राहण्याचा विक्रम सुद्धा स्त्रिया करू शकतात. मात्र आजही समाजात स्त्री आत्मनिर्भरपणे समाजात वावरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी निर्भय आणि निडर बनून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यार्थिनींनी स्वयं सिद्ध असले पाहिजे. स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देता आले पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.पूजा पाटील यांनी केले, तर प्रा. सौ. अर्चना हरीहर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील सचिव किरणराव पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

शौर्य बलिदान आणि त्याग म्हणजे वंदे मातरम- बलराज स्वामी कैरमकोंडा

 

बावडा दि.7. वंदे मातरम ही एक भावना आहे. की ज्यामुळे शौर्य बलिदान आणि त्याग डोळ्यासमोर उभे राहतात. असे प्रतिपादन एडवोकेट बलराज स्वामी कैरमकोंडा यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये गुरूवार (दि. 5) रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सिद्धार्थ चितारे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे आयक्युएसी प्रमुख डॉ. तायाजी लोंढे होते. प्रत्येक गोष्टीला काही कार्यकारण भाव असतो. वंदे मातरम् पाठीमागे असाच राष्ट्रभक्तीचा भाव होता. इंगजांनी वंदे मातरम् वरती बंदी घातली त्यामुळे देशप्रेम उफाळून आले. आजही अशी देशप्रेमाची भावना तरूणांच्या मनात असली पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लहू वावरे सर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन इम्रान शेख आणि प्रियांका खंडागळे यांनी केले, तर प्रा. सौ. अर्चना हरीहर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील आणि संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

 

पुणे, दि.८: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात जिल्हापरिषदा व पंचायतीसमितीकरिता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानप्रक्रिया पार पडली; या निवडणुकीकरिता ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

संपादकीय

पुणे , दि ८ : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २०१–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. *तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.*

प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!