Home Blog Page 2

चेतना इंटरनॅशनल स्कूल, सरडेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संपादकीय

चेतना इंटरनॅशनल स्कूल, सरडेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच संस्थेच्या सदस्या व प्राचार्या निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

नर्सरीपासून सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने व आनंदाने सहभाग नोंदवला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मस्के सर, सुनील गायकवाड सर, प्रांजली सुतार मॅडम तसेच पालक प्रशांत गुरगुडे आणि राहुल यादव यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. सई भिसे, ओंकार टिपाले, राजवीर माने, आद्या जमदाडे आणि आदिती गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. युवराज शिंदे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना दिली, तर ज्योती शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच समर कॅम्पसाठी आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व औक्षण मोरे मॅडम, डावरे मॅडम, उत्तेकर मॅडम आणि चव्हाण मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गलांडे सर यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले असून सूत्रसंचालन गोळे मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या केले.

अशा प्रकारे प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

 

पुणे, दि. 7 (जिमाका, वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत.

इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. पुणे जिल्ह्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,४८१, रास्ता पेठ, पुणे दूरध्वनी : ०२०-२६१३३६०६ येथे संपर्क साधावा.

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संपादकीय

पुणे, दि. ७: भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे संकलन अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्रगणकांद्वारे ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’विकसित करण्यात आले आहे. यामुळे कागदी काम गतीने होण्यासोबतच वेळ व श्रमाची बचत होणार आहे, जनगणनेच्या कामाकरिता प्रगणकांनी या अॅप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

मोबाईल अॅप केवळ गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल अॅप स्टोअर वरूनच डाउनलोड करावे. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅपचे अपडेट वेळोवेळी तपासावेत आणि अॅप अद्ययावत असल्याची खात्री करुन घ्यावी. मोबाईल अॅपमध्ये लॉगिन व त्याचा वापर केवळ एकाच नोंदणीकृत मोबाइल उपकरणावर करावे. उपकरणाची नोंदणी फक्त एकाच युजर आयडी लॉगिनसाठी करावी. आपले मोबाईल उपकरण, प्राधिकृत (चार्ज) अधिकारी यांनी जनगणना व्यवस्थापन व देखरेख प्रणाली (सीएमएमएस) वर घरयादी गटाच्या (एचएलबी) वाटपानंतरच नोंदणीकृत करावा. लॉगिनसाठी आवश्यक क्रेडेन्शियल्सचा तपशील चार्ज अधिकारी एसएमएस, ई-मेलद्वारे पुरविण्यात येणार आहे.

सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइल अॅपचा डीफॉल्ट पासवर्ड बदलावा. मोबाइल अॅप स्क्रीनवर दर्शविलेले स्थानासंबंधी तपशील नियुक्तीपत्रातील दर्शविलेल्या तपशिलानुसार असल्याची खात्री करावी आणि खात्री केल्यानंतरच आपणास दिलेल्या घरयादी गटाच्या क्षेत्रीय कार्याला सूरुवात करावी. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत, स्थानाच्या तपशीलामध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास, उपकरण नोंदणीस अडथळा निर्माण झाल्यास त्वरित चार्ज अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक ५-६ घर, कुटुंबाची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, ही माहिती केंद्रीय सर्व्हरवर अपलोड/सिंक करावी जेणेकरून माहिती गमावण्याची शक्यता टाळता येईल. ‘सिंक’ बटणावर क्लिक केल्यानंतर घरयादी गट पूर्ण झाल्याची पुष्टी करण्यासाठी चेक बॉक्सवर (✔) टिक करणे लक्षात ठेवावे. त्यानंतर रिक्त भागात तुमची स्वाक्षरी करून शेवटी ‘जतन करा’ या बटनावर क्लिक करावे. क्षेत्रीय कार्यादरम्यान आपले मोबाइल उपकरण सुरक्षित ठेवावे, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व लहान मुलांपासून दूर ठेवावा.

भारतीय जनगणना -२०२७ च्या कामाकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना आपल्याशी निगडित वस्तुनिष्ठ माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – १/५) (ऊर्जा विभाग)

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – १/५)

 

(ऊर्जा विभाग)

 

*महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना*

*महावितरणचा आयपीओ येणार ; कृषि वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी*

 

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) असे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 

बिगर कृषि वितरण क्षेत्रातील महावितरण या कंपनीला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण कंपनीने विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी आहे. या कर्ज दायित्वापोटी महाराष्ट्र शासन पंधरा वर्षे मुदतीचे दीर्घकालिन सरकारी रोखे जारी करणार आहे. यामुळे महावितरणवरील कर्जाचा बोजा कमी होऊन आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्यास मदत होणार आहे.

 

राज्यातील ग्राहकांना ऊर्जा सुरक्षा आणि गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणची आर्थिक स्थिती भक्कम करणे आणि वितरण व्यवस्थेत शाश्वतता निर्माण करण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात येणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठीय संधीचा लाभ घेण्यासाठी अशा दोन कंपन्यांची निर्मिती केली जाईल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या शिफारशी तसेच मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० च्या धोरणात्मक उद्दिष्टानुसार एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड ही कंपनी ३१ मे २०२३ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतीसाठीच्या वीज पुरवठ्याचे नियोजन आणि सौर ऊर्जेवर आधारित कृषि ऊर्जा प्रणाली विकसित करण्यासाठी संस्थात्मक आधारभूत रचना निर्माण होणार आहे.

 

महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचनेनंतर राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्याकडून केले जाईल. यात कृषि वितरण संस्था म्हणजेच एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड- एमसएएपीएल कंपनी केवळ कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देईल. तर अकृषिक वितरण संस्था म्हणजेच महावितरण औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती आणि इतर बिगर कृषि ग्राहकांना सेवा पुरवेल. या दोन्ही कंपन्यांचा वीज विक्री, महसूल व खर्चाचा तपशील यांचा लेखा-जोखा स्वतंत्रपणे मांडला जाईल. विभाजनानंतर सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत महावितरण आयपीओ आणला जाईल. त्यासाठी सेबीकडे आवश्यक त्या मंजुरी व वित्तीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. महावितरणचा आयपीओ – नवीन समभाग (फ्रेश इश्यू) आणि शासनाकडील समभाग विक्री (ऑफर फॉर सेल) याद्वारे आणला जाईल. यामुळे महावितरणाला विस्तारासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. यातून स्मार्ट मिटरिंग व डीजिटल वितरण प्रणाली, ऊर्जा संक्रमणाशी संबंधित गुंतवणूक, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण हे करता येणार आहे.

 

नवीन स्थापन होणाऱ्या कृषि वितरण कंपनी एमएसएपीएलला सुरूवातीचे भांडवल म्हणून अडीच हजार कोटी रुपयांचे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

या दोन्ही कंपन्यांच्या स्थापनेमुळे कृषि तसेच औद्योगिक, घरगुती ग्राहकांना स्थिर व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देता येणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना दिवसा व अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. कृषि क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक सौर ऊर्जिकरणाला चालना मिळणार आहे. औद्योगिक ग्राहकांना स्थिर व अखंडित वीजपुरवठा, दरवाढीवरील ताण कमी होणार, हरित ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच घरगुती ग्राहकांसाठी वीज दरांमध्ये अधिक स्थिरता येईल, सेवा गुणवत्तेमध्ये सुधारणा, डीजिटल बिलिंग व ग्राहक सेवा अधिक सक्षम होणार आहे.

*****

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ४/५) (नियोजन विभाग) महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर-(MRSAC) आता कंपनी

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ४/५)

(नियोजन विभाग)

 

*महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर-(MRSAC) आता कंपनी*

*रस्ते, नगररचना, जलयुक्त शिवार, डोंगरी विकास, ई- पंचनामा, खनिज व्यवस्थापनाला गती लाभणार*

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (MRSAC) संस्थेची सोसायटी कायद्यांतर्गत असलेली नोंदणी रद्द करून संस्थेची कंपनी म्हणून नोंदणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य शासनाने १९८८ मध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरची (MRSAC) स्थापना केली होती. सेंटरची पुणे आणि मुंबई येथे उपकेंद्रे आहेत. MRSAC ने भौगोलिक माहितीच्या आधारे रस्ते, नगररचना विभागाच्या प्रादेशिक योजना, जलयुक्त शिवार, पाणलोट विकास योजना, ई-पंचनामा, महाॲग्रिटेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिज आणि खाणी इत्यादींचा अभ्यास केलेला आहे. आता MRSAC च्या विविध प्रकल्पामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, आयओटी, वेब सेवा, क्लॉऊड काम्प्युटिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. यामुळे MRSAC समोरील आव्हाने आणि भूमिकेतील होणारा बदल लक्षात घेऊन MRSAC संस्थेची सोसायटी अधिनियम, १८६० कायद्यांतर्गत असलेली नोंदणी रद्द करून कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत कंपनीत रूपांतरित करण्यास आज मान्यता देण्यात आली.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नागपूर येथे असेल. कंपनीचे अध्यक्ष मुख्य सचिव असतील. कंपनीसाठी व्यवस्थापकीय संचालक पद नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अस्तित्वात असलेल्या पदांना कंपनीअंतर्गत कार्यरत ठेवण्यासही मान्यता देण्यात आली.

कंपनीच्या संचालक मंडळाची रचना पुढीलप्रमाणे :- मुख्य सचिव-अध्यक्ष, अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (नियोजन), अपर मुख्य सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (नगर विकास-१), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (ग्राम विकास), प्रधान सचिव/सचिव (माहिती तंत्रज्ञान), जिओ स्पेशल डाटा सेंटर, पुणे यांचे प्रतिनिधी, आयआयएसईआर, पुणे यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी, संचालक, जिऑलॉजी ॲण्ड मायनिंग, नागपूर, नामांकित/तज्ञ वैज्ञानिक (२), प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, व्यवस्थापकीय संचालक, MRSAC, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, MRSAC

(नियोजन विभाग)

*महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर-महाजिओटेक कंपनी स्थापन होणार*

*भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासनात गतिमानता*

भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर-महाजिओटेक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नवीन महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विभाग, संशोधन व प्रशिक्षण विभाग, भूस्थानिक नवोपक्रम व उद्योजकता विभाग आणि प्रशासन व लेखा असे चार विभाग असतील. आधुनिक तंत्रज्ञान विभागांतर्गत ॲप्लिकेशन व डेव्हलपमेंट हे दोन उपविभाग असतील. ॲप्लिकेशन उपविभागांतर्गत कृत्रिम बुध्दिमत्ता, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इमेज प्रोसेसिंग आणि फोटोग्रामेट्री या संदर्भातील धोरणे विकसित करणे व अंमलात आणणे, डेटा गुणवत्ता, अखंडता आणि सुरक्षितता निर्धारित करणे, ही कामे करण्यात येतील. तर डेव्हलपमेंट उपविभागांतर्गत भू-स्थानिक पोर्टल विकसित करणे व देखभाल करणे, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनचे डिझायनिंग आणि अंमलबजावणी, विविध प्रकारच्या विदा (डेटा) चे एकत्रिकीकरण करण्यासाठी आराखडे तयार करण्यात येतील. तसेच गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी विश्लेषणात्मक पध्दती राबविण्यात येईल.

संशोधन व प्रशिक्षण विभागात संशोधन व प्रशिक्षण असे दोन उपविभाग असतील. संशोधन उपविभागात भू-स्थानिक तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन व विकासाचे कार्ये केले जाईल. प्राधान्यक्रम निश्चित करून विद्यार्थी, व्यावसायिक आणि संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील. प्रशिक्षण उपविभागांतर्गत भू-स्थानिक कार्यक्रमात सहभागी संस्था, वापरकर्ते विभाग यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढविण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल. भूस्थानिक नवोपक्रम व उद्योजकता विभागात नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी कार्यक्रम आखण्यात येतील. बिझनेस रिइंजिनिअरिंगसाठी खाजगी क्षेत्रातील संस्था, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय संस्थांचा सहभाग घेण्यात येईल.

या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे असेल. संस्थेच्या उभारणीसाठी सुरूवातीचा खर्च म्हणून 25 कोटींचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

(आपत्ती व्यवस्थापन विभाग)

*महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी*

*आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा*

राज्यात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र रिझिलन्स फायनान्सिंग प्रोग्राम या नवीन संकल्पनेला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या कार्यक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या 165 कोटी रूपये निधीचा आपत्तीत फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मदत होणार आहे. आपत्तीग्रस्तांना गृह कर्जात तसेच त्या परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे. यात असंघटीत क्षेत्रातील कामगार तसेच महिला उद्योजक, बांधकाम, तसेच अन्य व्यावसायिक क्षेत्रातील छोट्या घटकांनाही मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्रा येथे अंमलबजावणी गट स्थापन करण्यात येणार आहे. पूर, उष्णतेची लाट, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीत या घटकांना वित्तीय सहायता करता येणार आहे.

आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी विभाग, जिल्हा, शहर स्तरावरील प्रशासनांच्या प्रतिसाद क्षमता वाढविण्यासंदर्भात अंमलबजावणी गट म्हणून मित्रा संस्था काम करणार आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार कऱण्यात येतील. यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णा व पंचगंगा नदी क्षेत्रातील कामांसाठी महाराष्ट्र मृद व जलसंधारण महामंडळ प्रकल्प अंमलबजावणी गट म्हणून काम करेल. या प्रकल्पांवरील देखरेखीसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री व जलसंपदा मंत्री यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली प्रकल्प मूल्यांकन समिती स्थापन करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

(माहिती तंत्रज्ञान विभाग)

*महाराष्ट्रात नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग*

*आयुक्तालयासह जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदे; नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग*

विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठण्यासाठी राज्यात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाची निर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण होणार आहे. यात सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेले माहिती तंत्रज्ञान कार्यासन वेगळे करून हा विभाग स्थापन करण्यात येणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर करून नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रीम बुध्दीमत्ता आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे. या आयुक्तालयासाठी 77 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील व इतर प्रशासकीय विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयामधील माहिती तंत्रज्ञानविषयक कामकाज हाताळण्यासाठी 427 पदांचा स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग निर्माण करण्यात येणार आहे. याचप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांच्या देखरेख-नियंत्रणासाठी तांत्रिक संवर्गातील 389 पदांकरिता बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र ई-मिशन टीम (एमईएमटी) स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय या विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार व्हावे, याकरिता अभियांत्रिकी पदवी शिक्षण झालेल्या 200 विद्यार्थ्यांसाठी अंतरवासिता (इंटर्नशिप) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील नागरिकांना शासनाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देणे, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना व कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, त्याचबरोबर राज्यातील संशोधन, तंत्रज्ञान व नवोपक्रम क्षेत्रातील प्रगतीचा एकात्मिक व समन्वित उपयोग करणे, राज्यासमोर असलेल्या विकासात्मक गरजा, प्रशासकीय आव्हाने व तंत्रज्ञानाधारित उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी धोरणनिर्मिती, अंमलबजावणीच्या कामांना वेग मिळणार आहे. स्वतंत्र विभाग स्थापन झाल्यामुळे डिजिटल सेवा, डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया, सायबर सुरक्षा व उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा नियोजनबद्ध वापर करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून शाश्वत शेती, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, स्वदेशी उत्पादन तसेच अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या निर्णयामुळे विविध स्तरांवर प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक व नागरिक-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.

या विभागाच्या पदनिर्मितीसाठी आवश्यक सुमारे 133 कोटी 35 लाख रुपयांच्या वार्षिक खर्चासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

*****

कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त राजेंन्द्र भारुड यांचा जीवन

कोल्हापूर शहराचे नूतन आयुक्त राजेंन्द्र भारुड यांचा जीवन संघर्ष….!
माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही.

ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.

पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यास क्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून १५० किलोमीटर दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच.

मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.

एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.

आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?

छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.

पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.

आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.

लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

(Copy pest)

इंदापूर येथील शिवराज अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर करगळ सर यांचा जन्मदिन हिंदुस्तान 24 न्यूज च्या मार्फत हॉटेल रेणुका येथे साजरा करण्यात आला

इंदापूर येथील शिवराज अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर करगळ सर यांचा जन्मदिन हिंदुस्तान 24 न्यूज च्या मार्फत हॉटेल रेणुका येथे साजरा करण्यात आला

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाद्वारे ‘अ’ श्रेणी प्राप्त

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाद्वारे ‘अ’ श्रेणी प्राप्त

संपादकीय,

चेतना फाऊंडेशन संचालित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे रायगढ द्वारे, ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी दिली.

विद्यापीठा द्वारे मार्फत नेमणूक केलेल्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे सदर सर्वेक्षण दर वर्षी करण्यात येते. देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. त्या वेळी महाविद्यालयाची भव्य व सुसज्ज इमारत, शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, रुग्ण समुपदेशन कक्ष, पायाभूत सुविधा, संगणक कक्ष, महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पालक सभा, औद्योगिक भेट, परीक्षेच्या निकाल, अनुभवी प्राध्यापक वृंद, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, नोकरी साठीचे नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी कडून मार्गदर्शन, मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा आणि रोजगार मेळावे अशा अनेक उपक्रमांमुळे तसेच निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न. या सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने साधलेली भरीव प्रगती व गुणवत्ता पाहून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी ‘अ’ श्रेणी प्रदान केली आहे.

या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे व सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी सांगितले.

चेतना फाउंडेशनच्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये द्वितीय सत्रातील शिक्षक -पालक सभा उत्साहात संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये द्वितीय सत्रातील शिक्षक -पालक सभा उत्साहात संपन्न

संपादकीय,

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय सत्रातील शिक्षक-पालक सभा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. चेतना फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने स्वागत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी पालकांना संबोधित करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर महाविद्यालय विशेष भर देत असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले. वर्गशिक्षिका प्रा. पायल निकम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत पालकांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. गीतांजली कांबळे यांनी प्रभावी शब्दांत मांडत मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला, तर आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता झगडे यांनी मनोगतपूर्ण शब्दांत करून कार्यक्रमाची सांगता केली.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या निकाल, उपस्थिती, प्रॅक्टिकल कामगिरी तसेच सहशैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक व उद्योगाभिमुख शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना सक्षम व्यावसायिक बनविण्यास मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पालकांनीही आपल्या सूचना व अभिप्राय मांडत महाविद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. एकूणच, हा पालक मेळावा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून पालक-शिक्षक संवाद अधिक बळकट करण्यास सहाय्यभूत ठरला आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

संपादकीय,
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे गुढीपाडवा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले ,
खजिनदार सोमनाथ माने, संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नर्सरी पासून ते सहावी पर्यंतचे विद्यार्थी अत्यंत उत्सुकतेने व आनंदाने कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले
विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या गुढ्या तयार करून आणल्या यामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व नवीन वर्षाचे स्वागत विद्यार्थ्यांना फरसाणा चॉकलेट देऊन खाऊ वाटप केले
नंबर मिळालेले विद्यार्थी खालील प्रमाणे.
प्री – प्रायमरी.
१) शर्विल गुरगुडे
२) राजवी गुरगुडे
३) रुद्र सरडे
प्रायमरी
१)आध्या जमदाडे
२) आरोही निचाळ
३) विराज टिपाले
तसेच सुतार मॅडम व शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुढीचे महत्त्व सांगितले तसेच काही पौराणिक कथा सांगितल्या.
कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले व सर्व कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!