चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत; वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा शिबिर
संपादकीय :-
आषाढी वारीनिमित्त श्री संत निळोबाराय पालखी सोहळा तसेच श्री संत खाशाबा महाराज पायी दिंडी सोहळा (दिंडी क्र. २१), मु.पो. गुणोरे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, श्री क्षेत्र गुणोरे–पिंपळनेर ते पंढरपूर या पायी वारीदरम्यान चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची रक्तदाब (बी.पी.) तपासणी करून त्यांच्या आरोग्याची प्राथमिक माहिती घेतली. तसेच वारकऱ्यांना ओआरएस (ORS) पाकिटे, वेदनाशामक बाम, पेन रिलीफ जेल, पोविडोन आयोडीन मलम, अँटासिड औषधे, वेदनाशामक गोळ्या, उलटीविरोधी औषधे तसेच इतर आवश्यक प्राथमिक आरोग्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय उष्माघात प्रतिबंध, स्वच्छता, पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन व पायांची काळजी याबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी पालखी सोहळ्याचे व वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी वारी परंपरेचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करत समाजसेवा हीच खरी मानवसेवा असल्याचे सांगितले. या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी दिंडी प्रमुख श्री. मनसुख दत्तात्रय बडे यांनी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे व्यवस्थापन, प्राचार्य, अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्मीय स्वागताबद्दल तसेच वारकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा शिबिराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांना आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, मानवता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमास चेतना फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी शुभेच्छा देत महाविद्यालयाच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. भविष्यातही अशा सेवाभावी व जनहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.