चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न
संपादकीय
चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी (ता. इंदापूर) येथे मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी ‘रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय महामार्गालगत महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी बारामती येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. तेजस मखरे हे मुख्य पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत आर.टी.ओ. विभागाचे श्री. नितीन कुंभार व श्री. विठ्ठल गावडे हे त्यांचे सारथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्य पाहुणे मा. श्री. तेजस मखरे यांचा सत्कार संस्थेचे खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला, तर त्यांचे सारथी श्री. नितीन कुंभार व श्री. विठ्ठल गावडे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी केला.
मार्गदर्शनपर व्याख्यानाची सुरुवात करताना मखरे सरांनी भारतीय संविधानातील कलम १९ याचा संदर्भ देत महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, कलम १९ नुसार प्रत्येक नागरिकाला देशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार आहे. पायी चालण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते; मात्र दुचाकी किंवा चारचाकी मोटार वाहन चालवण्यासाठी वैध वाहनचालक परवाना आवश्यक असतो.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ड्रायव्हिंग लायसन्स हा अधिकार नसून एक विशेषाधिकार (Privilege) आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाची जबाबदारी अधिक वाढते आणि प्रत्येक चालकाचे वर्तन संयमी, शिस्तबद्ध व जबाबदार असणे अत्यंत आवश्यक आहे.
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “वाहतुकीचे नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी आहेत.” विशेषतः तरुण चालकांनी रस्त्यावरील चिन्हे, वेगमर्यादा आणि वाहतूक कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान ‘मेंटी रिस्पॉन्स’ या डिजिटल माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेण्यात आली. रस्ते चिन्हे व ट्रॅफिक सिग्नल स्क्रीनवर दाखवून विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनद्वारे उत्तरे दिली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक व रंजक ठरला.
यानंतर वाहनमालकाच्या जबाबदारीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करताना, मखरे सरांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहनचालनाबाबत इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, जर विद्यार्थ्यांकडून चालवले जाणारे दुचाकी वाहन वडील किंवा कुटुंबातील अन्य प्रमुख व्यक्ती यांच्या नावे नोंदणीकृत असेल आणि त्या वाहनाकडून वाहतूक नियमांचा भंग झाल्यास, मोटार वाहन कायद्यानुसार दंड व कायदेशीर कारवाई ही मूळ वाहनमालकावरच केली जाते. त्यामुळे पालकांना कायदेशीर अडचणीत न आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मखरे सरांनी ‘गोल्डन अवर’ आणि ‘गुड समेरिटन’ या संकल्पनांबाबत अत्यंत मोलाची माहिती दिली. ते म्हणाले की, “अपघातानंतरचा पहिला एक तास हा ‘गोल्डन अवर’ असतो. या काळात जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.”
तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘गुड समेरिटन’ (देवदूत) व्यक्तींना पोलीस चौकशी किंवा न्यायालयीन कटकटीला सामोरे जावे लागत नाही. उलट, अशा मदतकार्य करणाऱ्या नागरिकांचा केंद्र व राज्य शासनाकडून २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक देऊन सन्मान केला जातो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवरांनी रस्ते सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याची, सुरक्षित व जबाबदार वाहनचालना करण्याची सामूहिक शपथ घेतली. या शपथविधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबतची जाणीव अधिक दृढ झाली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे, तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.