⭕“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”,
⭕परमबीर सिंग यांचा आरोप!
“दादरा-नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मी वारंवार परिस्थिती सांगून देखील आत्महत्येस उद्युक्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव टाकला.
शिवाय सर्व माहीत असून देखील या प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (S.I.T.) ची स्थापना करण्याची आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची घोषणा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ मार्च २०२१ रोजी केली”,
असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या पत्रात केला आहे.
आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी तब्बल २३ मुद्द्यांचा समावेश केला असून हे पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना पाठवले आहे.
आपल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
यामध्ये मुंबईतल्या बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझेंना देणे, गृहमंत्र्यांविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना आधीच माहिती दिली असणे अशा गंभीर दाव्यांचा समावेश आहे.
१०० कोटींच्या दाव्याच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी ए.सी.पी. पाटील यांच्यासोबतचे मेसेजेस देखील पत्रात दिले आहेत.