बावडा दि. 27 भाषा हे व्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषा ही समृद्ध व संपन्न भाषा आहे. अनेक भाषेतील शब्द मराठी भाषेमध्ये सहज सामावले आहेत आणि म्हणून मराठी भाषा संवर्धन करणे हे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक सिद्धार्थ चितारे यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये शुक्रवार (दि.27) रोजी आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी ही अभिजात भाषा असून ती आपली मातृभाषा असल्याने मातृभाषेतून ज्या सहजतेचा अविष्कार होतो तो इतर भाषेतून दिसून येत नाही. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्राध्यापिका सौ. अर्चना हरिहर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहु वावरे उपस्थित होते. एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून मराठीला राज्य भाषेचा दर्जा मिळाला आहे. आजचा हा दिवस मराठी भाषेची समृद्धी, तिची प्राचीनता आणि सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो.असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. याप्रसंगी कार्तिकी गायकवाड, प्रियंका खंडागळे, इम्रान काझी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ.पूजा पाटील यांनी केले, तर प्रा. सौ. शितल शेटे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील सचिव किरणराव पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.